बुधवार, जुलाई 26, 2006

dagadanchi khichadi

आटपाट नगर होते, नगर कसले मोठासा देशच होता तो. प्रत्येक आटपाट नगरवाल्या गोष्टीत एकतरी गरीब ब्राह्मण असतो, इथे जातीपातीचे काही माहीत नाही ; पण बरेच गरीब स्वभावाचे पांढरपेशे मध्यमवर्गीय राहत होते. शक्यतो शासन या बड्या मालकाकडे ते नोकरी करायचे म्हणून इतर त्यांना 'बाबू' असे म्हणायचे. या लोकांना ओळखायची खूण म्हणजे त्यांनी काहीही खाल्लं तरी सर्व पदार्थांची चव 'वरणभात, भेंडीची भाजी' या काँबिनेशनपेक्षा वेगळी लागत नसे.
दर दहा वर्षांनी शासन साहेबांकडे या पांढरपेशांचे प्रतिनिधी जाऊन वेतनवाढ मागायचे, तसे ते या वेळीही गेले. शासन साहेबांचे डोके(दरवेळेप्रमाणे याही वेळेस) चालेनासे झाले. परिस्थितीची पाहणी करून तोडगा काढायला साहेबांनी श्री. सहावे आयोग यांना आटपाट नगरात पाठवले. आयोग यांचे पूर्ण कुटुंबच शासन साहेबांच्या खास मर्जीतले होते, किंवा साहेबांना पडलेले प्रश्न मुळातून न सोडवता अधिक घोळ घालून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे कुटंब शासन दरबारी प्रसिद्ध होतं.
मोठा गाजावाजा करून आयोगजी नगरात आले. आल्या आल्या गांवभर फलक झळकवले,

"आयोग साहेबांचे जादूचे प्रयोग--खडखडाटी तिजोरीतील दगडांपासून वेतनवाढीची खिचडी.
-- उद्या दिनांक **-**-** रोजी अमूकतमूक मैदानात सर्वांदेखत आयोग साहेब वरील प्रयोग सादर करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी आपापली जेवणाची ताटे घेऊन ठीक सहा वाजता मैदानात उपस्थित राहावे."


या नगरात रोज हातावर पोट घेऊन जगणारे काही अतिगरीब लोक निरक्षर असल्याने त्यांनी हा फलक वाचलाच नाही. कॉर्पोरेट सेक्टर, बडे छोटे व्यापारी यांनी याकडे करमणुकीचा कार्यक्रम समजून दुर्लक्ष केले, त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये असल्या फालतू टाईमपासला वेळ नव्हता.
पण झाडून सारे पांढरपेशे बाबू या कार्यक्रमाला आपापली ताटे घेऊन उपस्थित राहिले. बरोबर सहा वाजता मोठाल्या लॉरीवर "खडखडाटी" नांवाची शासन साहेबांची ती सुप्रसिद्ध तिजोरी घेऊन आयोग साहेबांचे आगमन झाले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रसिद्ध जादूगाराच्या आविर्भावात आयोग साहेबांनी तिजोरीचे दार उघडून आतमध्ये फक्त पाच सहा दगडच कसे आहेत हे जनतेला दाखवले. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.
मैदानाच्या मधोमध एक मोठे चुलाणे रसरसत होते आणि त्याच्याखाली इंधन म्हणून पाचव्या वेतनआयोगाच्या चोपड्या , परदेशी कर्जाच्या खतावणी इ. जाळले जात होते. या चुलाण्यावर 'गंगाजळी' नामक मोठे पातेले ठेवण्यात आले. हो, आटपाट नगरात तिजोरीप्रमाणे पातेल्यांनाही गंगाजळी, अमुक निधी , तमुक पॅकेज अशी नांवे असत. तिजोरीतले दगड या पातेल्यात टाकून वर जनतेच्या अपेक्षांवरून फिरवलेले मंतरलेले पाणी ओतून आयोग साहेबांनी मोठा जाळ करून दिला. आत्तापर्यंत प्रयोगाची कीर्ती ऐकून आटपाट नगराचे झाडून सारे मंत्रीगण व्ही. आय. पी. कक्षात ही अद्भुत खिचडी पाहायला जमले होते.
आयोगरावांनी खिचडीची महती गायला सुरुवात केली. मग म्हणाले "लोकहो, थोडे तेल असेल तर काय मजा येईल, दगड चांगले परतता येतील."
लगेच अर्थमंत्र्यांनी 'तेल' नांवाचा कर लोकांना लावून तिथल्या तिथे पुरेसे तेल जमा करून आयोगरावांना दिले.
मग आयोगराव म्हणाले,"वा! आता दगड चांगले परततो. अरेच्च्या! पण मोहरी आणि जिरे असेल तर काय मजा!"
लगेच गृहमंत्री पुढे झाले आणि पोलीस दलाकडे आधीच कमी असलेली जिरेमोहरी काढून त्यातली काही आयोगरावांच्या खिचडीला दिली. कोणीतरी वित्तआयोगवाला ''अरे , तुम्ही अंतर्गत सुरक्षेच्या वाट्याची मोहरी यांना दिलीत " असं म्हणत होता, पण कुणाचेच तिकडे लक्ष गेले नाही.आयोगराव मात्र म्हणाले,"अहो, फोडणी वाचून का खिचडी बनलीये कधी?"
"तेही बरोबरच," असे म्हणून मोहरी जिरे, आलं वगैरे सामान गृहमंत्र्यांकडून मिळाले.
मग आयोगराव म्हणाले"छे हे सगळं ठीक. पण मुगाची डाळच नसेल तर कसली आलीये खिचडी!" मग आरोग्यमंत्र्यांनी ''सर्वांसाठी आरोग्य'' योजनेतून चांगली भरपूरशी डाळ दिली आणि ती कमी पडली म्हणून संरक्षणमंत्र्यांनी आपल्याकडची (म्हणजे स्वतःच्या घरातली नव्हे हो,) डाळ सुद्धा दिली. आता डाळ परतल्याचा खमंग वास सुटला आणि समस्त पांढरपेशांच्या तोंडाला पाणी सुटले. मग त्यांनीच खिशात हात घालून 'इनकमटॅक्स' नावाचा थोडा मसाला दिला..
चतुर आयोगराव म्हणाले,"वा वा! आता तर दगड छान परतून झाले. थोडे पाणी घालून शिजवले की मस्त खिचडी तयार. पण.. भरीला मूठभर तांदूळ घातले तर काय बहार येईल!"
प्रधानमंत्र्यांना ते पटले. लागलीच जागतिक बँकेला फोन करून या अभिनव खिचडी योजनेला साहाय्य म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जाऊ तांदूळ घेऊन पुरवण्यात आला. सुंदरशी चमचमीत खिचडी काही तासांत तयार झाली.
आता ताटे घेऊन आलेल्या पांढरपेशांची चुळबूळ वाढू लागली. सगळेच खिचडी चापायला धावू लागले. पण मग श्रेणीवार खिचडीचे वाटप होणार असे सांगून निम्म्यापेक्षा जास्त लोकांना घरी पाठवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगण्यात आले.
ज्यांना आज खिचडी मिळाली ते खूश, ज्यांना उद्या मिळणार ते ही खूश कारण उशीरा खिचडी दिल्याबद्दल त्यांना खिचडीचे अरीअर्स मिळणार होते.
रात्री गुपचूप पातेल्यातले दगड काढून धुऊन खडखडाटी तिजोरीत बंद करून तिजोरी जागेवर ठेवताना शासन साहेब आणि आयोग साहेब दोघेही गालातल्या गालात हसत होते. पांढरपेशे घरी जाऊन परत एकदा भेंडीची भाजी खाऊन सुखस्वप्ने बघत झोपी गेले होते.
काही असंतुष्ट सो कॉल्ड बुद्धीवादी मात्र उगाच मैदानाबाहेर फसवणुकीच्या बोंबा ठोकत बसले होते.

Birthday!

"राजा, परसों क्या दिन है याद है ना?""हो साती, परवा तुझा वाढदिवस आहे, मी कसा विसरेन?""तो , क्या गिफ्ट दे रहा है मुझे?""वही, हिरों की अंगुठी""शीः, हे कसलं गिफ्ट, मिनुला माहित्येय का तिच्या नवऱ्याने वाढदिवसाला सिंगापूरला नेलं होतं, मला पण तू सिंगापूरला घेऊन चल.""बाये, सिंगापूरला जायचं म्हणजे काही खायचं काम आहे का? दोन एक लाख रुपये लागतील दोघांनी जायचं म्हणजे! कुठून आणणार मी?""हे काय रे राजा , काहीतरी युक्ती कर ना!"
जगातल्या सगळ्या बायकांपेक्षा वेगळं असं माझं माझ्या नवऱ्याबद्दलचं मत आहे. जगात त्याच्यापेक्षा हुशार कुणीच नाही आणी माझ्यापेक्षा तर त्याला खूप जास्त कळतं हे माझं स्पष्ट मत आहे. कुठल्याही गोष्टीतून तो मार्ग काढू शकतो हे माहिती असल्यानेच हे दोन लाख उभे करायचं काम मी बिनधास्तपणे त्याच्यावर सोपवलं.
"एक तरकीब है, " पेपर बाजूला ठेवत राजा म्हणाला. " पण इट विल रिक्वायर युवर को-ऑपरेशन""सिंगापूर आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी" राजाने त्याचा प्लॅन मला ऐकवला. मी तो कोणतीही शंका न घेता (नेहमीप्रमाणे ) मान्यही केला."ओ. के. , सगळ्यात पहिलं आपल्याला तुझं नाव बदलायला लागेल""का, रे?""अगं, अशा धमाक्यासाठी नावही कसं हवं एकदम सूट होणारं, जसं की प्रिन्स, आता तुझं नाव प्रिन्सेस नको, पण 'राणी ' ठेवूया""वा,वा राजा, किती हुशार रे तू, हेडलाईनपण छान होईल 'राणीकी याद में राजा परेशान,' वा!"
झालं, दुसऱ्याच दिवशी मला घेऊन राजा हॉस्पिटलच्या मागे एका बागेत महापालिका एक बोअरवेल खणत होती तिकडे घेऊन आला. चांगला ५६ फुटी खड्डा होता तो. तळाची जमीन बऱ्यापैकी भुसभुशीत दिसत होती. "चलो हो जाओ तय्यार" असं म्हणत राजाने एक हलकासा धक्का देऊन खड्ड्यात ढकलून दिलं आणि मी बसले पडत 'ऍलिस इन वंडरलँड' मधल्या ऍलिससारखी, सिंगापूरची स्वप्नं बघत. धप्पकन खाली आपटले. थोडंसं खरचटलं, एक दातही हलू लागला पण जास्त काही लागलं नाही. "राजाचं प्लॅनिंग असंच व्यवस्थित हो नेहमी" मी मनात म्हणाले.
इकडे राजाने जीवघेणा आकांत करायला सुरुवात केली. मग कुणीतरी फायर ब्रिगेडला बोलावणं पाठवलं, कुणीतरी सबसे तेज वाहिन्यांना कळवलं. एका तासातच त्या ठिकाणी पिकनिक स्पॉटवर जमते तही गर्दी जमली. गर्दी बघून राजा अगदी मोठ्याने आक्रोश करू लागला.
झालं, वाहिन्यांचं लाइव्ह टेलिकास्ट सुरू झालं. राजाला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. त्यातून जे बाईट्स मिळाले त्यावर पंधरा- पंधरा मिनिटांचे कार्यक्रम सुरू झाले.
वाहिनीकन्येने विचारले--" मि. राजा, रानीको आप कबसे जानते है?"''बरसों से, जब हम जे. जे. में यु. जी. कर रहे थे तबसे"
की लगेच जे. जे. हॉस्पिटलाबद्दल माहिती देणारी पंधरा मिनिटे.

"तो 'रानीको बचाओ' के इस भाग का सवाल है ' राजाको रानीसे प्यार हो गया गाना कौनसे फ़िल्म का है?' सही जवाब देनेवालेको राजारानी ट्रॅव्हल की ओरसे काश्मीर ट्रीप"

अजून फायर ब्रिगेडचा पत्ता नव्हता. राजाच्या खोट्या काळजीचं रुपांतर खऱ्या काळजीत होऊ लागलं. इतक्यात खूपशा सायरनचे आवाज ऐकू आले आणि आलं एकदाचं फायर ब्रिगेड म्हणणाऱ्या राजाला दिसल्या K. A. ने नंबर सुरू होणाऱ्या कर्नाटकी गाड्या. चक्क कर्नाटकचे मुख्यमंत्री आले होते. मागचे दोन तास टी.व्ही. वर आमचेच गुणगान चालल्याने राजा कर्नाटकचा आहे , मी कोंकणातली आहे, उद्या माझा वाढदिवस आहे हे तमाम भारतीयांना ठाऊक झाले होते. पण म्हणून इतक्या लवकर कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येतील असं वाटलं नव्हतं. सिलिकॉन सिटीच्या कृपेने कर्नाटक खूपच फास्ट झालंय याची प्रचिती आली. खड्ड्याजवळ एका खुर्चीत बस्तान ठोकत" कर्नाटकके एक घर की बहू पुरे कर्नाटककी बहू है(टाळ्यांसाठी पॉज) आज इसे बचाने के लिये बँगलोरसे एक खास हायटेक टीम आ रही है" असं म्हणून महाराष्ट्र सरकारच्या अकार्यक्षमतेविषयी चार वाक्य बोलून झाली.
तेवढ्यात परत सायरनचा आवाज झाला. आतातरी नक्कीच फायर ब्रिगेड असं राजाला वाटतंय तोवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूर्ती गाडीतून उतरली. "कर्नाटकच्या भूलथापांना फसू नका, आमची टीम आमच्या मुलीची काळजी घेण्यास समर्थ आहे, ते ही जमलं नाही तर केंद्राची मदत घेण्यात येईल.मॅडमची या घटनेवर बारीक नजर आहे''
"अस्सं, मग मागचे चार तास झाले अजून तुमची फायर ब्रिगेडचीच गाडी कशी नाही आली?'' क. मु. नी टोला हाणला."ती गोष्ट महापालिकेच्या अखत्यारीतील आहे आणि तिथे अपोजिशनवाले आहेत, या निमित्ताने तरी सेनेची महापालिका किती अकार्यक्षम आहे आणि मुंबैवर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास असमर्थ आहे हे साऱ्या देशाला कळले असेल."
एवढ्यात परत सायरन वाजला. आता कोणता राजकारणी आला असा राजा विचार करतोय तोवर चक्क फायर ब्रिगेडची गाडी दिसायला लागली. पण राजकारण्यांच्या गाड्या, वाहिन्यांच्या व्हॅन्स यांच्यामुळे घटनास्थळी येण्यास त्यांच्या गाडीला प्रचंड अडथळा येत होता, त्यात बघ्यांची गर्दी. किमान दोन तास रस्ता क्लिअर करण्यातच जाणार होते. त्यात पहिल्यांदा कुणाच्या गाड्या मागे घ्यायच्या, क. मु. च्या की म. मु. च्या यावरही तिथे तू तू मै मै सुरू झालेली.
एवढ्यात एका वाहिनीला या कार्यक्रमाच्या मुख्य नायिकेची आठवण झाली , एक पातळसा दोर सोडून एक कॅमेरा आत सोडण्यात आला. "रानीजी खडड्डेमें गिरनेके बाद आप कैसा महसूस कर रहे हो" वरून प्रश्न विचारण्यात आला. " मी आधीच आत राहून राहून वैतागले होते , मी रडायलाच सुरुवात केली आणि "मला खूप भिती वाटतेय" एवढेच बोलू शकले.
झालं , मी रडतेय याचा अर्थ राजाने मला त्रास दिला असणार इथपासून राजानेच मला खड्ड्यात ढकलले असणार असा लावून आमच्या ओळखीच्या लोकांचे बाईत घ्यायला सुरुवात झाली. "नाही तसंतर त्यांच्यात काही भांडण नव्हतं, पण नवराबायकोत काय हो छोट्यामोठ्या कुरबुरी होतंच राहतात" आमचे टीव्हीवर दिसायला धडपडणारे एक शेजारी.
"हो, काल काहीतरी हिरे, अंगठी इ. वरून वाद चालला होता खरा" दुसरे सतत भिंतीला कान लावून असणारे शेजारी. झालं हे ऐकताच माझी नोंद सगळ्या वाहिन्यांनी 'हुंडाबळी ' या सदराखाली करून टाकली आणि राजावर प्रश्नांचा भडिमार होऊ लागला. करायला गेलो काय आणि होतंय काय हे बघून राजा बिचारा गांगरूनच गेला.
लगेच एका वाहिनीची प्रादेशिक व्हॅन माझ्या कोंकणातल्या घरी पोचली. आईबाबा अगोदरच मिळेल त्या वाहनाने मुंबईला यायला निघालेले. घरात गावातले खूप लोक आणि आज्जी एकटीच.
" आजीबाई, आपल्याला काय वाटतं , राजाने राणीला खड्ड्यात ढकलले असेल?"
"शिरा पडली तुज्या तोंडावर नी काठी आली तुज्या कॅमेरावर! माज्या नातजावयाबद्दल म्होरं काय बोललंस तर रां*वा तुझ्या झिंज्याच उपटंन"
काही सनसनाटी बाईट न मिळता गाडी निघून गेली.

कार्यक्रमके इस भाग के प्रायोजक थे, महाकेश हेअर ऑइल. बाल बने अंदरसे स्ट्राँग!

इकडे एक गाडी कर्नाटकातल्या घरी. सासूबाई अख्ख्या गावासोबत टीव्हीवर माझ्या सुटकेचं नाट्य बघत होत्या. त्यांचे देव केव्हाचे पाण्यात बुडवलेले होते." राणीला राजानेच खड्ड्यात ढकलले याबद्दल तुमचं काय मत आहे?"
"निमदं हेणा होग ग्वाडीमॅक कुडली (गावठी कानडीत -मुडदा बश्शिवला तुझा भित्ताडाला टेकून) लाज नाही वाटत असं विचारायला. सासूबाईंनी कॅमेराच्या रोखाने उगारलेला दगड बघून वाहिनी -बाला मागच्या मागे कॅमेरासकट पळाली.

कार्यक्रम के इस भाग के प्रायोजक थे गुडबाय अंडरटेकर्स-- अवर केअर स्टार्टस व्हेन युवर लाईफ एन्डस!

इकडे खड्ड्याजवळ रणांगण झालं होतं. क. मु. आणि म. मु. याच्यात एकमत होत नसल्याने क. किंवा म. यांपैकी एकही टीम पुढे येत नव्हती. राजाचा धीर सुटत चालला होता. इकडे खड्ड्यात प्राणवायू आणि पाण्याअभावी मला गुंगी येत होती. तितक्यात लष्कराचं विमान उतरलं. जवान बाहेर पडले. प्रसंगावधान राखून प्रथम मला ऑक्सिजन आणि पाणी मिळण्याची व्यवस्था केली गेली. आणि सुरू झाला "राणी को बचाओ" चा सगळ्यात रोमांचक भाग.
तोपर्यंत सगळ्या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारात माझ्या सुटकेसाठी प्रार्थना सुरू झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस असल्याने "हॅपी बर्थ डे राणी"चे बोर्ड लागले होते, केक बनत होते. राजा आणि राणी असे शब्द असलेल्या गाण्यांचा गजर होत होता.
शेवटी दहा तासांनी मला बाहेर काढण्यात जवानांना यश आलं. मी बाहेर आल्या आल्या स्वतःच धावत राजाकडे गेल्याने राजाने मला खड्ड्यात ढकलले नसावे यावर पोलिसांसकट सगळ्यांचेच एकमत झाले आणि राजाचा जीव भांड्यात पडला.
लगेच माझ्या सुटकेचं क्रेडिट घेण्याची अहमहिका सगळ्या राजकारण्यांत सुरू झाली. क.मु. नी मदत म्हणून एक लाख रु. दिले. म. मु. नी त्यावर मात म्हणून दोन लाख रु. आणि वर आम्हा दोघांनाही एक महिना भरपगारी रजा देऊन टाकली. "राजा राणी अमर रहे'' या जयघोषात आमची मिरवणूक काढण्यात आली. बिचाऱ्या जवानांची एकावन्न हजार रुपये बक्षीस देऊन बोळवण करण्यात आली.

टकटकटक, दारावर आवाज झाला. "सॉरी साती, आजभी मुझे लेट हो गया! एक बॅड पेशंट आला होता गं, तुला बारा वाजता फोन करायला सुद्धा मिळाला नाही गडबडीत. आणि ती डायमंड रिंग आणायला विसरूनच गेलो, उद्या दोघं जाऊन घेऊ." तोफांचा भडिमार, अश्रूंचा वर्षाव व्हायच्या आत राजाने बोलायला सुरुवात केली.
"अरे पण सिंगापूरचं बुकींग केलंस का?" मी विचारलं. आणि मी काय बोलतेय हे न कळल्याने राजा माझ्याकडे पाहतंच राहिला.